बीड, 5 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. त्यांच्या उपोषणाच्या काळात मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात विविध प्रकारचे आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. तर या आंदोलनात काही हिंसक घटना देखील घडल्या होत्या. यामध्ये बीड जिल्ह्यातील अनेक नेत्यांना मराठा आंदोलकांनी लक्ष केले. त्यावेळी संतापलेल्या मराठा आंदोलकांनी बीड मधील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा बंगला आणि गाड्या पेटवून दिल्या. याशिवाय त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्यांना तसेच कार्यालयांना आग लावली. सोबतच या आंदोलकांनी बीड मधील राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून दिले. याशिवाय, बीड मध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना देखील घडल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर याप्रकरणी अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
कोहलीची सचिनच्या विक्रमाची बरोबरी; 49वे शतक पूर्ण!
तर बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या या हिंसाचाराची पाहणी आज बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी बीड हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
“विविध पक्षांची कार्यालये पेटवणे, व्यावसायिक आस्थापनांची जाळपोळ, लोकप्रतिनिधींची त्यांचे कुटुंबीय घरात असताना घरे जाळणे, इत्यादी घटना ज्या पद्धतीने घडल्या आहेत, त्यातून यामागे संवैधानिक पद्धतीने चाललेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव कोणीतरी साधू पाहत आहे, असा संशय बळावतो. या सर्व हल्ल्यांच्या घटनांचा तपास पोलीस करतच आहेत मात्र याची सखोल चौकशी एस आय टी कमिटी स्थापन करून करण्यात यावी, अशी मागणी गृह विभागाकडे करणार आहे.” असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. त्यामुळे बीड येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी एस आय टी कमिटी स्थापन होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका
One Comment on “बीड हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी – धनंजय मुंडे”