बारामती, 28 जानेवारी: बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्यासोबतचे खास आणि भावनिक क्षण टिपलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
https://x.com/i/status/2016383359975620675

पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना.” अशा शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तसेच पंतप्रधान मोदी यांनी या दुर्घटनेत आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून, या दुःखाच्या क्षणी ईश्वर त्यांना शक्ती आणि धैर्य देवो, अशी प्रार्थनाही केली आहे. अजित पवार यांचे अकाली निधन हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठीही मोठी हानी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच सध्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावरून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

