इंदापूर, 3 सप्टेंबरः निरा डावा कालव्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते. तसेच सायपणद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. यामुळे निरा डावा कालव्याचे अस्तरीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी शेटफळ तलाव बचाव कृती समितीने पुण्यातील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांना निवेदन दिले.
पावसामुळे कुरकुंभ परिसरातील पूल पाण्याखाली
निरा डावा कालव्याच्या 152 किलोमीटरपैकी फक्त 35 किलोमीटरचे अस्तरीकरण होणार आहे. जिथे पाण्याची गळती होते, भराव कमकुवत आहे, भराव फुटण्याची शक्यता आहे, जिथे वळणे आहेत, अशाच ठिकाणी हे अस्तरीकरण होणार आहे. याचा परिणाम पाण्याची गळतीवर होणार असून कालव्याची वहन क्षमता वाढणार आहे. शेटफळ तलाव कमी कालावधीत भरण्यास मदत होणार आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.
सदरचे निवेदन शेटफळ तलाव बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रा. पंडित पाटील, महादेव घाडगे, अजित टिळेकर, संकेत काटकर यांनी दिले. सदर प्रसंगी बारामती विभागाचे उपअभियंता अश्विन पवार उपस्थित होते.