भीषण आगीत एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू

मुंबई, 06 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील चेंबूर येथे रविवारी (दि.06) पहाटे एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 मुलांचा समावेश आहे. त्यामुळे सध्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ही आग इतकी भीषण होती की त्यामुळे हे दुकान आणि घर जळून खाक झाले. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा सध्या तपास करण्यात येत आहे.

दुकानाला आग लागली

मुंबईतील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. याठिकाणी दुकानाला लागलेली आग वरील घरापर्यंत पोहोचल्याने संपूर्ण या घरातील 7 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ही दुमजली इमारत असून या इमारतीच्या तळमजल्यावर किराणा मालाचे दुकान आणि वरच्या मजल्यावर हे घर होते. या घरात एक कुटुंब राहत होते. पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती. सर्वप्रथम दुकानाला आग लागली. त्यानंतर या आगीने रौद्ररूप धारण केले आणि ही आग वरच्या मजल्याला देखील लागली. त्यावेळी वरच्या मजल्यावरील घरातील कुटुंब झोपले होते. त्यामुळे या दुर्घटनेत 3 लहान मुलांसह 7 जणांचा मृत्यू झाला.

आगीचे कारण अस्पष्ट

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून ही आग आटोक्यात आणली. त्यानंतर त्यांनी येथील लोकांना बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी या कुटुंबातील सर्वांना मृत घोषित केले. पोलीस आणि अग्निशमन दल या दुर्घटनेचा तपास करीत आहेत. तपासानंतरच या आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस उपायुक्त हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *