मुंबई, 25 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची आज (रविवारी) एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागाचे मंत्री उपस्थित होते. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्याआधी या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1827697664579813458?s=19
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय संक्षिप्त स्वरूपात
1) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मार्च 2024 पासून लागू होणार आहे.
2) राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देण्यात येणार असून या योजनेची व्याप्ती वाढवली जाणार असल्याची माहिती या बैठकीतून देण्यात आली आहे.
3) गटप्रवर्तकांच्या मानधनात 4 हजार रुपयांची भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4) ऑलिंपिकवीर स्वर्गीय पैलवान खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देण्यात येणार आहे.
5) थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता राज्य सरकारची हमी मिळणार आहे.
6) पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढण्यात येणार आहे. पुणे परिसरास सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे.
7) नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 7 हजार 15 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा होणार आहे.
उर्वरित शासकीय निर्णय –
8) सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी असणार आहे.
9) शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे.
10) ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ असणार आहे. सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ मिळणार आहे.
11) ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित 5 हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे.
12) बार्टी’ च्या ‘त्या’ 763 विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ मिळणार आहे.
13) मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करण्यात येणार आहे. विविध महामंडळे प्रकल्प राबविला जाणार आहे.
14) कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ.
15) कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ करण्यात येणार आहे.
16) चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल केला जाणार.
17) श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना मिळणार.
18) पाचोऱ्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
19) सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.