मुसळधार पावसामुळे चंद्रपुरातील जनजीवन विस्कळित, शेती पिके आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

चंद्रपूर, 21 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. या पडलेल्या पावसामुळे येथील नदी-नाल्यांना पुर आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लोकांच्या घरात आणि शेतात पाणी शिरले होते. तसेच त्यावेळी चंद्रपुरातील अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 500 ते 600 घरांचे नुकसान झाले असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

https://x.com/InfoChandrapur/status/1814650586186289463?s=19

नुकसानग्रस्त घरांचे व शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश

दोन दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड – नागपूर हायवे पुराच्या पाण्यामुळे बंद पडला होता. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आले होते. ते रस्ते पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मार्ग मोकळे झाले आहेत. दरम्यान, या पावसाचा फटका काही शेती पिकांना देखील बसला. तसेच यावेळी अनेक नागरिकांच्या घरांचे देखील नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेती पिकांचा तसेच घरांचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत.

पावसामुळे जीवितहानीच्या घटना

दि. 19 व 20 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील एका घराची भिंत पडल्यामुळे पाच लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील विलंब या गावातील 8 ते 10 वर्षाचा मुलगा नाल्यांतून वाहून गेला आहे. त्याच्या शोध घेण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध बचाव पथकाला पाठवण्यात आले आहे. तसेच नागभीड तालुक्यातील बोथली येथील नाल्यात पडल्याने 30 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह स्थानिक शोध बचाव पथकाला मिळाला आहे, अशी माहिती देखील जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ब्रम्हपूरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी जोरदार पाऊस झाला. या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यात सर्वाधिक 190.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड 120 मिमी, चिमूर 107.1 मिमी, सिंदेवाही 102.4 मिमी, सावली 68.6 मिमी, मूल 64.7 मिमी, वरोरा 47.4 मिमी, बल्लारपूर 30.5 मिमी, पोंभुर्णा 20.3 मिमी या तालुक्यांत देखील मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडत असून पुढील 2 ते 3 दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. नागरिकांनी मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 07172-250077 आणि 07172-272480 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच पूर परिस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *