भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे, अजित पवार यांचे ट्विट

मुंबई, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. या 4 जागांपैकी एकच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी पक्षाला यश आले. या निकालानंतर अजित पवार यांनी ट्विट करून महायुतीला मतदान केल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अपयशाने खचून न जाता नव्या उत्साहाने पुन्हा एकदा कामाला लागावे, असे आवाहन अजित पवार यांनी यामध्ये केले आहे.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1797998510190535005?s=19

एनडीएच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन

“लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो,” असे अजित पवार यांनी यामध्ये म्हटले आहे.

अपयशाने खचून जाऊ नये

“राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, अशी अपेक्षा अजित पवारांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन!” असे ट्विट अजित पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *