लोकसभा निवडणूक; सहाव्या टप्प्यासाठी आजपासून अधिसूचना जारी!

नवी दिल्ली, 29 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. सहाव्या टप्प्यात देशातील 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांमध्ये 25 मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे सहाव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून (29 एप्रिल) सुरू झाली आहे. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 मे असून, कागदपत्रांची छाननी 7 मे रोजी होणार आहे. तसेच सहाव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 9 मे असणार आहे.

https://twitter.com/ECISVEEP/status/1784882580359147864?s=19

या जागांवर मतदान होणार

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांतील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे. या सहाव्या टप्प्यात दिल्लीच्या 7, उत्तर प्रदेशच्या 14, हरियाणाच्या 10, बिहार आणि पश्चिम बंगालच्या प्रत्येकी 8, ओडिशाच्या 6 आणि झारखंडच्या 4 जागांवर मतदान पार पडणार आहे. या जागांवर 25 मे रोजी सहाव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे.

सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया

तत्पूर्वी, देशात यंदा 7 टप्प्यांत लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या जागांचा निकाल 4 जुन रोजी लागणार आहे. यामधील 2 टप्प्यांतील मतदान यापूर्वीच पूर्ण झाले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यात 88 जागांवर मतदान झाले. आता 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 95 जागांवर लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या 11 मतदारसंघांत मतदान होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *