लोकसभा निवडणूक: शिवाजीराव आढळराव पाटील यांचा शिरूरमधून उमेदवारी अर्ज दाखल!

पुणे, 25 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल केला आहे. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार दिलीप मोहिते, आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार सुनील टिंगरे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार पोपटराव गावडे, भाजप नेते प्रदीप कंद, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, भाजपा नेत्या आशा बुचके, राष्ट्रवादीच्या नेत्या पूर्वा दिलीप वळसे पाटील, माजी सभापती मंगलदास बांदल, मनसे शहरप्रमुख साईनाथ बाबर व महायुतीतील सर्व पक्षांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

https://twitter.com/ShivajiAdhalrao/status/1783446103876325570?s=19

https://twitter.com/ShivajiAdhalrao/status/1783444702723019221?s=19

महायुतीकडून शक्तिप्रदर्शन!

तत्पूर्वी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महायुतीकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन या मार्गावर आढळराव पाटील यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अजित पवार यांच्यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आढळराव पाटील यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या.

शिरूरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीतील फुटीमुळे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा सामना पाहायला मिळणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा देखील शिवाजीराव आढळराव पाटील विरूद्ध अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. यावेळी आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर, अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. अमोल कोल्हे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज काही दिवसांपूर्वीच दाखल केला आहे. तत्पूर्वी, मागच्या लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर उभे असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *