बारामती, 15 जुलैः केंद्र शासनाकडून अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागू होणार असल्याबाबतचा अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिलमध्ये घेतला आहे. सदर बाबतचे नोटीफिकेशन 13 जुलै 2022 रोजी काढले आहे. यामुळे नवीन जीएसटी 18 जुलै 2022 पासून लागू होणार आहे.
केंद्र सरकारने अन्नधान्य, खाद्यान्न व जीवनावश्यक वस्तूंवर 5 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा मोठा परिणाम व्यापारावर, शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार आहे. त्यामध्ये अन्नधान्य, गहू, तांदूळ, रवा, मैदा, पीठ, दूध, पनीर, लस्सी, ताक, गुळ, कडधान्य फक्त मीठ सोडून सर्व वस्तूंचा समावेश केला आहे.
सदर जीएसटी 18 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. सदर बाबत देशव्यापी बंद शनिवार, 16 जुलै 2022 रोजी पुकारला आहे. सदर बंदमध्ये बारामतीचे सर्व ठोक आणि किरकोळ किराणा व्यापारी सामील राहणार आहेत. तसेच शनिवार, 16 जुलै 2022 रोजीचा बंद 100 टक्के यशस्वी करावा, अशे निर्णय दि बारामती मर्चंट असोसिएशन व बारामती किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या आयोजित बैठकीमध्ये घेण्यात आला.