जरांगे पाटलांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांनी बोलायचे टाळले!

मुंबई, 25 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता, त्यांनी यावर बोलण्याचे टाळले आहे. “जरांगे पाटील काय बोलले, हे मी ऐकलेच नाही. त्यामुळे मी यासंदर्भात काय बोलणार?” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, देवेंद्र फडणवीस यांना माझा जीव घ्यायचा आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर जाणार आहेत. यासाठी ते अंतरवाली सराटीतून मुंबईला रवाना झाले आहे.

नितेश राणे आक्रमक!

दरम्यान, जरांगे पाटलांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटलांचे जे आंदोलन आहे ते कशासाठी आहे? मराठा समाजासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने राजकारण करण्यासाठी आहे? असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना हे स्क्रिप्ट कोठून येते? हे देखील पाहिले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांना फक्त टार्गेट करण्याचे काम सुरू आहे, असे नितेश राणे यावेळी म्हणाले आहेत.

आमची भिंत पार करावी लागेल: नितेश राणे

मनोज जरांगे पाटील यांनी हे लक्षात ठेवावे की, आम्ही पण मराठा समाजाचे आहोत. तुम्ही सागर बंगल्यावर पोहोचण्याच्या आधी एक भिंत म्हणून आम्ही तेथे उभे आहोत. पहिली आमची ती भिंत पार करा आणि मग सागर बंगल्यावर पोहोचण्याचा विचार करा, असे आव्हान नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *