मुंबई, 15 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आणखी 7 हजार किलोमीटर रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेंतर्गत अतिरिक्त 7 हजार किमी रस्त्यांसाठी 7 हजार 612 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची महिती राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 10 हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यांपैकी 7 हजार किमी रस्त्यांच्या कामांना राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
https://twitter.com/girishdmahajan/status/1757997340726800673?s=19
या ठिकाणी होणार दळणवळणाचा विकास
यामध्ये प्रामुख्याने संशोधन विकास कार्यक्रमांतर्गत रस्ते आणि पुलांची कामे करण्यात येणार आहेत. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महानगरपालिका, साखर कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र, वाळू आणि खडीच्या खदानी, मोठ्या नद्या, औद्योगिक परिसरापासून 10 किमीच्या आणि नगरपालिका, नगरपरिषद, छावणी बोर्ड हद्दीपासून 5 किमीच्या मर्यादेतील रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी निवड करण्यात येणार आहे. सोबतच ज्या ठिकाणी रस्त्यांची सुधारणा झाली आहे. मात्र त्याठिकाणी पुलांअभावी दळणवळण होत नाही, अशा ठिकाणी पूल उभारण्यात येणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला
दरम्यान, राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किलोमीटर रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील दळणवळणाचा विकास होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भातील निर्णय काल मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील विविध मंत्री उपस्थित होते. यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.