मुंबई, 06 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घोटाळ्याचा आरोप केला आहे. राज्यात 8 हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजत असताना सरकारने आता नवीन मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रूपयांचे मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा विचार आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 1 लाख 14 हजार 974 मोबाईल खरेदीसाठी सरकारी तिजोरीला 155 कोटी रुपयांचा चुना लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने हेच पैसे जर अंगणवाडी सेविकांच्या थेट बँक खात्यात दिले असते तर हा घोटाळा झाला नसता, असे विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत.
https://twitter.com/VijayWadettiwar/status/1754789131413332335?s=19
155 कोटींचा मोबाईल घोटाळा: वडेट्टीवार
“महायुती सरकारमध्ये दोन अलिबाबा आणि 80 चोर आहेत ज्यांची पैसे खाण्याची भूक आता प्रचंड वाढली आहे. लोकसभा आचारसंहिते अगोदर सरकारी तिजोरी लूटून आपली तिजोरी भरून घेण्यासाठी अनेक शक्कल लढवल्या जात आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या महायुती सरकारचे ब्रिद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजत असताना सरकारने आता नवीन मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रूपयांचे मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
मतं मिळवण्यासाठी राज्य सरकार साड्या वाटणार: विजय वडेट्टीवार
त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना सरकार साड्या वाटणार आहे. हा घोटाळा देखील 100 कोटींच्यावर आहे. या दोन्ही घोटाळ्यातील वाटा मंत्री आणि सरकारला मिळणार आहे. असा आरोप देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मोबाईल द्यायचा असेल तर सरकारने अंगणवाडी सेविकांच्या खात्यात थेट पैसे जमा करावेत. अंगणवाडी सेविकांना हवा तो मोबाईल घेण्याची मुभा द्यावी. मग भ्रष्टाचार होणार नाही. अशी मागणी त्यांनी यावेळी केली. अंगणवाडी सेविका प्रामाणिक आहेत. त्यांच्यावर सरकारचा विश्वास नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान राज्यातील अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाच्या वतीने लवकरच अँड्रॉइड मोबाईल फोन देण्यात येणार आहेत.