नवी दिल्ली, 30 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने 15 राज्यांतील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. यासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. तर त्याची मतमोजणी त्याच दिवशी करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निवेदनानुसार, राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या 8 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. 16 फेब्रुवारी रोजी या अर्जाची छाननी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 20 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
15 राज्यांत होणार राज्यसभा निवडणूक
राज्यसभा निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याची मतमोजणी त्याचदिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. दरम्यान, यावेळेस अनेक राज्यांत राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा या 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत.
या खासदारांचा कार्यकाळ संपणार!
महाराष्ट्रातील राज्यसभेचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार अनिल देसाई, प्रकाश जावडेकर, कुमार केतकर, व्ही. मुरलीधरण आणि वंदना चव्हाण यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या या रिक्त 6 जागांसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याचा निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे.