मुंबई, 29 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) मुंबईत आज ‘कृषि मूल्य साखळी भागीदारी बैठक-2024’ चे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीचे आयोजन कृषी विभाग व महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA),स्व.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) आणि ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (VSTF) यांच्या वतीने करण्यात आले होते.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1751966832947302786?s=19
शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विविध नामांकित विपणन कंपन्यांसोबत करार
या बैठकीत 16 शेतकरी उत्पादक कंपन्या आणि विविध नामांकित विपणन कंपन्या यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये हिंदुस्तान युनिलीवर, ॲमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेड, कोका-कोला, पेप्सिको, ओएनडीसी, जैन इरिगेशन, ईटीजी ग्रुप, एडीएम इंडिया, मॅरिको, टाटा केमिकल्स, टाटा रॅलिस, आणि अदानी विल्मर या कृषी व्यवसाय संस्था तसेच वर्ल्ड बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक, नाबार्ड, नबकिसान फायनान्स लिमिटेड, सिडबी, आणि आयडीबीआय बँक या वित्तीय संस्था यांच्यासह 62 कंपन्यांचे व जागतिक बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
https://twitter.com/dhananjay_munde/status/1751928301730615787?s=19
शेतकऱ्यांनी शेतीला उद्योग म्हणून पाहावे व त्यादृष्टीने शेती करावी: धनंजय मुंडे
कॉर्पोरेट कंपन्या आणि किरकोळ विक्रेत्यांशी थेट संबंध प्रस्थापित करून शेतकरी उत्पादक कंपन्यांचे उत्पन्न अधिकाधिक वाढवण्याच्या दृष्टीने मार्ग तयार करणे, बाजारातील गरज, गुणवत्ता यादृष्टीने कृषी मूल्य साखळी विकसित करण्यासाठी आजची भागीदारी बैठक उपयुक्त ठरणार असल्याचे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. “शेतकऱ्यांनी शेतीला उद्योग म्हणून पाहावे व त्यादृष्टीने शेती करावी, शेतकरी समूह स्थापन करून कृषी उत्पादक कंपन्यांची सुरुवात करावी व अधिकाधिक उत्पन्न मिळवावे,” असे आवाहन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1751967265552011381?s=19
शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मनोगत व्यक्त केले आहे. “शेतकरी राजाला नवनवीन तंत्रज्ञान, कृषी व पणन प्रणाली समजावून दिल्यास कृषी मूल्य साखळी विकसित होण्याने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडून येईल. महाराष्ट्राचे हे पाऊल क्रांतिकारक ठरेल. आज झालेल्या सामंजस्य करारांमुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. याचा शेतकरी आणि नागरिकांना फायदा होईल,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1751960220010787220?s=19
शेतकरी कृषीमाल थेट या कंपन्यांना विकू शकणार: उपमुख्यमंत्री
“राज्य सरकारने आज अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या विविध कंपन्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे शेतकरी आपला कृषीमाल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. “शेतीचे क्षेत्र सबसिडीतून आणि नुकसानभरपाईतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना 2014 ते 2019 या काळात झाल्या. शेती क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, स्मार्ट यासारख्या योजनांची आखणी झाली. वातावरणपूरक शेती हाही प्रयत्न झाला. शेतकर्यांना थेट बाजाराशी जोडण्याचा जोडण्याचा निर्णय झाला. त्यासाठीच कृषी मूल्य साखळीच्या उपाययोजना प्रारंभ करण्यात आल्या. आता हा पुढचा टप्पा प्रारंभ केल्याबद्दल धनंजय मुंडे यांचे अभिनंदन! राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठिशी अतिशय खंबीरपणे उभे आहे.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.