चांदवड, 17 एप्रिलः नाशिकच्या चांदवड तालुक्यातील खडकजांब येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खडकजांब येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरच एका तरुणाचा मृतदेह जाळल्याची घटना शनिवार, 16 एप्रिल रोजी सकाळी समोर आली. यामुळे स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यापासून खडकजांब गावातील सार्वजनिक स्मशानभुमीचा प्रश्न चिघळला आहे. सदर वाद हा न्यायालयात गेला आहे. या गावात दोन स्मशानभूमी आहेत. मात्र रस्ता नसल्याने हा वाद उद्भवला आहे. या गावातील काही ग्रामस्थांनी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्या मिळावा, यासाठी उपोषणही केले. तसेच चांदवड तहसील कार्यालयासह वरिष्ठांकडे या बाबत दादही मागितली. मात्र तोडगा मिळाला नसल्याने हा वाद आता न्यायालयात प्रलंबित आहे.
खडकजांब येथील एका आदिवासी तरुण अमोल अशोक कोकाटे (वय-25) यांने शुक्रवारी, 15 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मात्र मृतदेहाचा अंत्यविधी कुठं करायचा, यावरून मतभेद होऊ लागले. मृतदेह जाळण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करायचा, असे ठरले. मात्र सरपंच पुजा अहिरे, उपसरपंच नाना गुंजाळ, ग्रामसेवक अजय पुरकर यासह ग्रामपंचायत सदस्यांनी कार्यालयासमोर मृतदेह जाळू नका, अशी विनंती केली. मात्र संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी, सकाळी 11 च्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोर मृतदेह जाळला. यावेळी काही काळ गावात तणावाचे वातावरण होते.